अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं खळबळजनक वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झालेला आहे. यावरून राजकीय पक्षांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी याबाबची भाजपाची भूमिका स्पष्ट करत, संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले आहे.

कंगना रणौतने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत, भाजपाला त्याच्याशी जोडणं दुर्देवी व चुकीचं असल्याचं शेलार यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केलं आहे. तसेच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत, सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींचा विपर्यास किंवा दुसऱ्या दिशेने नेण्यासाठी कंगना रणौतच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नसल्याचेही शेलार यांनी यावेळी बोलून दाखवले.

आणखी वाचा- तुम्हाला पाकड्यांनी मतदान केलं आहे का? संजय राऊतांचा कंगनाला समर्थन करणाऱ्या नेत्यांना सवाल

आशिष शेलार म्हणाले की, ”सुशातसिंग राजपूतच्या प्रकरणातून जेवढी वळणं, या चौकशीला वेगवेगळ्या दिशेनं नेता येईल तेवढा प्रयत्न, काही राजकीय मंडळी वारंवार करत आहेत. हे महाराष्ट्र व देश बघतो आहे. आजच ज्या पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्यावर आमची स्पष्ट भूमिका आम्ही मांडत आहोत. कंगना रणौतने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवणारं कुठलंही वक्तव्य कंगना रणौतने केलं असेल किंवा केलेलं आहे, त्याच्याशी भाजपाला जोडणं दुर्देवी व चुकीचं आहे. आम्ही त्याच्याशी असहमत आहोत.”

आणखी वाचा- “मी अ‍ॅक्शनवाला माणूस आहे,” कंगनाच्या धमकीच्या आरोपांवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

तसेच, संजय राऊत यांना देखील आमचं सांगणं आहे की, सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींचा विपर्यास किंवा दुसऱ्या दिशेने नेण्यासाठी कंगना रणौतच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असताना, कुठल्याही अशा पद्धतीच्या वक्तव्यावर वातावरण तापवण्यापासून सगळ्यांनी स्वतःला वाचवलं पाहिजे, असे देखील शेलार यांनी यावेळी बोलून दाखवले.

भाजपा नेत्यांकडून कंगनाचा उल्लेख झाशीची राणी करण्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. हा झाशीच्या राणीचा सगळ्यात मोठा अपमान असल्याचंही ते म्हणाले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने पाठबळ निर्माण करण्याच्या हेतूने अशा व्यक्तींच्या पाठीशी उभं राहू नये, ते बुमरँग होईल असं संजय राऊत यांनी  प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे.

संजय राऊत यांनी यावेळी भाजपाचं नाव न घेता टीका करताना “मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या प्रवृत्तींना जे पाठीशी घालत आहेत त्या राजकीय पक्षांना मुंबई, महाराष्ट्रात मतं मागण्याचा अधिकार नाही. ही लोकं जी निवडून आली आहेत त्यांना काय पाकड्यांनी मतदान केलं आहे का ? याचा खुलासा त्या पक्षाकडून होणं गरजेचं आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणताना लाज वाटली पाहिजे. मुंबईचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला येथे राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही,” असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.