टोल, वाहनतळ आणि संजय गांधी नॅशनल पार्कसारख्या मनोरंजन उद्यानांच्या ठिकाणचे प्रवेश शुल्क शाळा बसगाडय़ांना माफ करण्यात यावे, अशी मागणी बसचालकांच्या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. मुंबईतील शाळा बसचालकांना मुलुंड, ठाणे, दहिसर, वाशी आणि सी-लिंक या टोल नाक्यांवर टोल भरावा लागतो. या मार्गावर तब्बल १२४ शालेय बसगाडय़ा दिवसभरात ये-जा करीत असतात.  यापैकी काही गाडय़ा तर दिवसभरात सहावेळा ये-जा करतात. त्यावेळी भरावा लागणारा टोल आम्हाला विद्यार्थ्यांकडून घ्यावा लागत नाही. त्याऐवजी तो आम्हाला आमच्या खिशातून भरावा लागतो. त्यामुळे, या टोलमधून आम्हाला माफी मिळावी, अशी मागणी ‘स्कूल बस मालक संघटने’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केली आहे.