मुंबई : दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी एका बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ व्यक्तींचा शोध घ्यावा, असे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, करण्यात येत असलेल्या उपाययोजना आदींच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चहल यांनी हे आदेश दिले. मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे करोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ व्यक्तींचा शोध घ्यावा आणि त्यांची तपासणी करावी, असे आदेश चहल यांनी दिले.

चहल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच एका रुग्णाच्या संपर्कातील १० व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या काम सुरू होते. मात्र मुंबईमध्ये करोनाचे रुग्ण वाढतच आहे. करोना संसर्गाला आळा घालण्यासाठी एका रुग्णाच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. यामुळे वेळीच संशयित रुग्ण सापडतील आणि त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.