कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित असलेल्या वरिष्ठ निरीक्षक संजीव कोकीळ यांना थेट बडतर्फ करण्यामागे फेरीवाल्यांवरील कारवाई महागात पडल्याचे दिसून येत आहे. कोकीळ यांची बडतर्फी हा संपूर्ण पोलीस दलालाच धक्का असून आता यापुढे कोणीही आपले अधिकार वापरण्याचीही हिंमत करणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक असताना कोकीळ यांनी क्रॉफर्ड मार्केटबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. हप्त्यासाठी ही कारवाई करण्याची आल्याची टीकाही तेव्हा झाली होती. इतकेच नव्हे, तर या कारवाईवरून तत्कालीन सहायक आयुक्तांनीही आक्षेप घेतला होता. मात्र कुणालाही न जुमानता कारवाई सुरूच राहिल्याने फेरीवाल्यांनी एका अल्पसंख्याक मंत्र्याला साकडे घातले. या मंत्र्याने कोकीळ यांना दूरध्वनी करून दमदाटी केली. मात्र या दबावालाही न जुमानता कोकीळ यांनी कारवाई सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांच्यावर फेरीवाल्यांकडून खंडणी उकळल्याचे तसेच काही फेरीवाल्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचे आरोप करण्यात आले. या प्रकरणी कोकीळ यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली. त्यात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले. आपल्याला जाणूनबुजून भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकविण्यात आल्याचा आरोप कोकीळ यांनी केला आहे.मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त ए. के. जैन यांना दोन लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक करवून देण्यात कोकीळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लाचप्रकरणात आयपीएस अधिकारी अटक होण्याची ती पहिलीच वेळ होती. मात्र तेव्हापासून त्यांच्या मागे प्रकरणांचे शुक्लकाष्ठ लावण्यात आले होते. २००० मध्ये भायखळ्यातील एका डान्सबारवर कारवाई करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल जैन यांना पाठविण्यात आला होता. या प्रकरणात निलंबनाची कारवाई न करण्यासाठी कोकीळ यांच्याकडे जैन यांनी पाच लाख रुपये मागितले होते.माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक असताना कोकीळ यांना फसवणुकीच्या प्रकरणात एका जवाहिऱ्याच्या जावयाने दहा लाखांची लाच देऊ केली होती. यावेळीही कोकीळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करून त्याला पकडून दिले होते.