संदीप आचार्य

महाराष्ट्रात वेगाने करोना रुग्ण वाढत असताना वारंवार सांगूनही चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात नाही. याचे गंभीर परिणाम होऊन रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ होईल, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला दिला आहे.

कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली, तेलंगणा आदी राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रमाणात करोना चाचण्या करण्यात येतात. जास्तीतजास्त चाचण्या वेळेत केल्यास रुग्णाचा लवकर शोध लागू शकतो तसेच त्याचा जीवही वाचू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून कळवले आहे. आम्ही गेल्या आठवडय़ात दहा लाख लोकांमागे रोज सरासरी किती चाचण्या केल्या जातात याची माहिती घेतली असता रोज सरासरी ३७७ चाचण्या केल्या जात असल्याचे दिसून आले. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे एका महिन्यात सरासरी जास्तीत जास्त रोज किती चाचण्या झाल्या याची माहिती घेतली असता दहा लाख लोकांमागे ५८३ चाचण्या घेण्यात आल्या असून यात करोनाबाधितांचा दर हा २६.९ टक्के होता.

करोनासाठी प्रतिजन (अ‍ॅन्टिजेन) चाचण्या करण्यामागे तात्काळ रुग्ण शोध घेणे, लागण झालेल्या विभागात तसेच करोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांच्या तात्काळ तपासणीसाठी ही चाचणी योग्य असली तरी लक्षणे असलेल्या व अ‍ॅन्टिजेन चाचणी नकारात्मक आली तर पुन्हा चाचणी करणे आवश्यक असल्याचे अपर सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे अ‍ॅन्टिजेन चाचणीसाठी स्वॅब घेतानाच दोन स्वॅब घ्यावे जेणे करून काही शंका आल्यास करोना चाचणीही करता येईल व रुग्णाला पुन्हा चाचणीसाठी यावे लागणार नाही. दुर्दैवाने त्याचीही अंमलबजावणी महाराष्ट्रात होताना दिसत नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात ५३९ करोना चाचणी प्रयोगशाळा असून यापैकी २१८ प्रयोगशाळेत शंभरपेक्षा कमी चाचण्या केल्या जातात. या प्रयोगशाळांच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला जावा. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमणे त्यांच्या शिफ्टपासून योग्य व्यवस्थापन करण्यासही सांगण्यात आले आहे.

कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, करोना चाचणी लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी जागोजागी ‘किऑक्स’ उभारण्याची शिफारसही आम्ही केली होती. मुंबईत प्रत्येक वॉर्डात किऑक्स उभारण्याची घोषणाही झाली होती. या ठिकाणी लोकांनी जाऊन आपले स्वॅब द्यायचे होते. या केंद्रात केवळ स्वॅब गोळा केले जाणार होते व तेथून ते प्रयोगशाळेत नेण्याची कल्पना होती. आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची खंत डॉ. ओक यांनी व्यक्त केली.

‘नियमांची कठोर अंमलबजावणी नाहीच’..

मुखपट्टी, अंतर नियम तसेच सॅनिटाइजरचा वापर हे करोनाला रोखण्यासाठी प्रमुख शस्त्र असले, तरी आज त्याबाबतही राज्यात कोठेच अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि मोठय़ा प्रमाणात चाचण्या करा हे वारंवार सांगूनही त्यावरही ठोस निर्णय होत नाही, असे राज्याचे प्रमुख आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.