मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाची (एमएमआर) झपाटय़ाने होणारी वाढ नियोजित पद्धतीने व्हावी यासाठी पालघर जिल्ह्य़ातील पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग आणि रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांतील ४३३ गावांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव गुरुवारी विधिमंडळाने मंजूर केला. महानगर प्रदेशात शहापूर आणि मुरबाड तालुक्याबरोबरच रायगडच्या कर्जत तालुक्यातील आदिवासी भागाचाही समावेश करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महानगर क्षेत्राचा सुयोग्य व नियोजित विकास होण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला होता. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी ‘एमएमआरडीए’च्या हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विधानसभेत मांडला. त्या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसारच ‘एमएमआरडीए’च्या हद्दवाढीचा प्रस्ताव आणण्यात आला असून महापालिका, नगरपालिकाना मदत करण्याच प्राधिकरणाची भूमिका आहे. या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असून महानगर प्रदेशातील अनाधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणणे आणि योग्य नियोजन करण्यासाठी ही हद्दवाढ करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. महानगर प्रदेशात ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड आणि शहापूर या दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी भाजपचे किसन कथोरे यांनी केली. तर कर्जत तालुक्यातील शेलू ते कळंबोली तर्फे वडेरी आणि ताकवे, भालीवडी, सावेळे, हेदवली, मांडवणे, भिवपुरी या गावांसोबतच परिसरातील आदिवासी भागाचाही महानगर प्रदेशात समावेश करण्याची मागणी राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांनी केली. एमएमआरडीएने मुंबई- ठाण्याबाहेर ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. तर डहाणू तालुका पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याने या भागाचा विकास खुंटला असून ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी मनीषा चौधरी यांनी केली. ‘एमएमआरडीए’ क्षेत्र ६२७२ चौरस कि.मी. हद्दवाढीच्या प्रस्तावानुसार महानगर प्रदेशात नव्याने पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग, रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्याच्या उर्वरित भागाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ‘एमएमआरडीए’चे पूर्वीचे ४२५४ चौरस कि.मी. क्षेत्र वाढून आता ६२७२चौरस कि.मी. होणार आहे. त्यात ४३३ नवीन गावांचा समावेश करण्यात आला असून बोईसर, पेण आणि विरार येथे विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती योवेळी देण्यात आली.