मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. राज्यातील या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. काल शरद पवार यांनी आपल्या पक्षातील आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या बैठकीत ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, राज्यपालनियुक्त १२ आमदार, या मुद्द्यांवर देखील चर्चा होणार असल्याची देखील शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, निवडणुकांची रणनिती, ओबीसींचं राजकीय आरक्षण या विषयांवर चर्चा झाली. तसेच बैठकीत काही आजी माजी आमदारांनी तक्रारी मांडल्या. सत्तेत असलेले शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील काम करत नसल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.

हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिवसेना, काँग्रेसविरोधात नाराजीचा सूर; नवाब मलिक म्हणाले…

आमदारांना झुकतं माप

याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. “तीन पक्षांचं सरकार असताना प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना झुकतं माप देते. दोन पक्षांचं सरकार असताना हीच तक्रार होती. कधी कधी एका पक्षाचं सरकार असताना पण तक्रार असते. तीन पक्षाचं सरकार असल्याने प्रत्येक प्रश्न सुटेल असं नाही. जे आमदार आहेत किंवा पराभूत उमेदवार आहेत. यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देतील.”, असं राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

“काही जिल्ह्यांमध्ये आम्ही पालकमंत्री असताना किंवा आमचं वर्चस्व असताना काँग्रेसच्या तक्रारी येऊ शकतात. काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचं वर्चस्व असताना आमच्या किंवा शिवसेनेच्या तक्रारी होऊ शकतात. जिथे जिथे एक पक्षाचं सरकार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आमदारांचे मतभेद असतात. प्रत्येक आमदाराला आणि नेत्यांना असं वाटतं आपल्या मतदारसंघातील कामं जास्त झाली पाहीजेत. हा काही मोठा प्रश्न असं आम्ही मानत नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.