आगामी २०१९च्या निवडणुकांच्या रणनितीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व पक्षीय असा सामना होईल असे नुकतेच राहुल गांधी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल. राजकारणातील बदल स्विकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही. उलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले, २००४मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना इंडिया शायनिंग या मोहिमेद्वारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करताही निवडणूक जिंकलो होतो. त्यानंतर एकत्र येत मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले होते. त्यामुळे हे जरूरी नाही की आधीच पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जावे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत आहेत. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्षही आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर, मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपाला सातत्याने विरोध दर्शवला आहे. मात्र, या पक्षांशी एकत्र येण्याबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.