डाव्या आणि ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेला ‘भारत बंद’ महाराष्ट्रामध्ये केवळ औद्योगिक बंदमध्ये परावर्तित केल्यामुळे नाराज झालेले हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष शरद राव यांनी ‘कामगार संघटना संयुक्त कृती समिती’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय शुक्रवारी राव एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करणार आहेत.
भारत बंदच्या आधी दोन दिवस मुंबईमध्ये कामगार संघटनांनी बंदची पाश्र्वभूमी तयार करण्यासाठी लाँग मार्च काढला होता. या मोर्चामध्ये शिवसेनाही सहभागी झाली होती. मात्र या सहभागाबद्दल राव यांनी संयुक्त कृती समितीमध्ये नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिवसेनेला या बंदमध्ये कामगार संघटेनेच्या नेत्यांसोबत बसविण्यासही त्यांनी नकार दिला होता. या मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंदबाबत परस्पर निर्णय घेतल्यानंतर तेथे उपस्थित कोणत्याही कामगार संघटनेच्या नेत्यांनी विरोध न केल्यामुळेही राव कृती समितीवर संतप्त झाले होते. यामुळे राव यांनी बंदमधूनही माघार घेतली होती.