संदीप आचार्य

आश्रमशाळांमधील आजारी पडणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रथमोपचार मिळावा यासाठी यापुढे प्रत्येक आश्रमशाळेत ‘शुश्रूषा खोली’ तयार करण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे. या खोलीमध्ये आवश्यक असणाऱ्या औषधांसह सर्व सोयीसुविधा असणार आहेत. विशेष म्हणजे आश्रमशाळांच्या गरजा लक्षात घेऊन यासाठी प्रत्येक आश्रमशाळेला पाच लाख रुपयांचा निधीही देण्यात आला आहे.

राज्यात शासनाच्या ५०२ आश्रमशाळा असून यात सुमारे एक लाख ९१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे सोळा एकलव्य निवासी शाळांमध्ये सुमारे ३,५१८ विद्यार्थी शिकत असून या सर्व आश्रमशाळांसाठी ‘शुश्रूषा खोली’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत आश्रमशाळांच्या दुरवस्थेवरून विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आमदारांकडून अनेक आरोप करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची सोय नाही तसेच स्वच्छतागृहांचा प्रश्न तसेच विद्यार्थ्यांचे होणारे मृत्यू याबाबत वेळोवेळी मुद्दे उपस्थित केले गेले. २००३ ते २०१६ या कालावधीत सुमारे १४१६ विद्यार्थ्यांचे साप, विंचू चावून तसेच आजारपणामुळे आणि आत्महत्यांमुळे मृत्यू झाले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार दर वर्षी सुमारे २८० विद्यार्थ्यांचे मृत्यू होतात. राज्यपालांनी याची दखल घेत आदिवासी विभागाची व तज्ज्ञांची एक बैठक घेऊन आश्रमशाळांमध्ये होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांची तसेच दर्जा सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना करावयाच्या यासाठी राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली २०१६ मध्ये एक समिती नेमली होती. या समितीने आपल्या अहवालात अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी आश्रमशाळांमध्ये संगणकीकरणापासून आरोग्यविषयक अनेक सुधारणा करण्यास सुरुवात केली.

दुर्गम भागातील ३०१ आश्रमशाळांसाठी अटल आरोग्यवाहिनी  सुरू करण्यात आली. तसेच ‘अमेय लाइफ’च्या माध्यमातून प्रत्येक शाळेची विशेषज्ञांच्या माध्यमातून वर्षांतून एकदा तपासणी व डिजिटल आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार येणार आहे. याशिवाय आजारी विद्यार्थ्यांची शुश्रूषा करण्यासाठी आता प्रत्येक शाळेत शुश्रूषा खोली तयार केली आहे.

दुर्गम व अतिदुर्गम भागांतील ३०१ आश्रमशाळांसाठी ४८ अटल आरोग्यवाहिनी घेण्यात आल्या असून पुण्यात त्यासाठी मध्यवर्ती कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. हे कार्यालय १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका केंद्राबरोबर समन्वयाने काम करणार आहेत. तसेच आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून आवश्यक त्या औषधांची शुश्रूषा खोलीत व्यवस्था केली जाणार आहे. शुश्रूषा खोली व आश्रमशाळांच्या अन्य गरजा भागविण्यासाठी आवश्यकतेनुसार अधिक निधीही दिला जाईल.

– डॉ. किरण कुलकर्णी, आदिवासी आयुक्त