राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेवर टीका करणे चांगलेच महागात पडल्याचे दिसते. शिवसेनेला गांडुळाची उपमा देणारे अजित पवार हे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. सत्तेच्या खुर्च्या उबवून स्वत:चेच हित पाहाणाऱ्या अजित पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय असा सवाल उपस्थित केला आहे. काका शरद पवारांच्या कृपेमुळे आतापर्यंत मानसन्मान मिळाला. पण त्यांना नेतृत्व उभे करता आले नाही. कारण त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या जाणाऱ्यांवर त्याच तोंडाने थुंकून ते घाण करत असतात. शरद पवारांनी कमावलेलं अजित पवारांनी अल्पावधीतच गमावलं. अजित पवार दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहेत काय, असा सवाल सेनेने उपस्थित केला.

कोल्हापूर येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनावेळी अजित पवारांनी शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, अशा शब्दांत टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून घेतला. राज्याच्या राजकारणात अजित पवारांची काहीच पत नाही पण त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळत असतो. अजित पवार यांचे राजकारण आता बारामतीपुरतेसुद्धा उरलेले नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अजित पवारांना जवळजवळ पराभूतच केले होते. महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सत्ताही धुळीस मिळाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदही राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे. तरीही हे सांगाडे ‘हल्लाबोल’ यात्रेच्या नावाखाली उसने अवसान आणत आहेत

अजित पवारांच्या निष्क्रियतेमुळे शरद पवारांना ७५ व्या वर्षी पक्षबांधणीसाठी वणवण करावी लागत आहे. अजित पवार शिवसेनेला गांडुळाची अवलाद म्हणतात. गांडुळ हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. अजित पवार दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहेत काय असा सवाल उपस्थित केला. दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात, अशा शब्दांत टीका केली. शिवसेना सत्तेत असतानाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रान उठवले. पण तुम्ही १५ वर्षांत काय केलं.

जमीन घोटाळे व पाणी घोटाळ्याशिवाय काय केलेत, सत्तेवर असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मंत्रिमंडळातून बाहेर पडता आले असते पण तुम्ही दुतोंडी सापाच्याच अवलादीप्रमाणे काँग्रेसी चिखलात सत्ता उबवत वळवळत राहिलात. भुजबळांबरोबर तुरूंगात जाण्याची भीती असल्यामुळेच भाजपाचे बूट चाटीत शिवसेनेवर हल्ला करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.