Shiv Sena Dasara Melava 2018 : सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्यात विविध मुद्द्यांवरुन शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपली भुमिका स्पष्ट केली. राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकारवर यावेळी त्यांनी तोफ डागली. महागाई, महिला अत्याचार कमी कसे होत नाही असा खडा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, राम मंदिर उभारण्याची आठवण करुन देण्यासाठी आपण २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाऊन सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आणि इथं विचारले तेच प्रश्न तिथं मोदींना विचारणार, आम्ही तुमचे दुश्मन नाही पण तुम्ही जनतेच्या भावनेशी केळू नका. त्यांच्या आशेवर पाणी पडलंच तर त्याचा लाव्हा व्हायला आणि त्यात तुम्ही भस्म व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा उद्धव यांनी दिला. तसेच त्यांनी यावेळी पाकिस्तानवरूनही केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले, सतत वल्लभभाई पटेलांचं नाव घेता. अहो मग तुम्ही काय करता, पाकिस्तानचे तुकडे करण्याऐवजी फक्त सोईचं राजकारण करता आहात. जर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता.