इंधनदरवाढीच्या विरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नसल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षाला उशिरा जाग आली आहे. आम्ही आधीपासून महागाई वाढल्याचे सांगत आलो आहोत. विरोधी पक्ष अपयशी ठरल्यानंतर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, मनसेने उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिला असून मनसैनिक स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.

काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी सोमवारी इंधन दरवाढीविरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. महागाई व इंधन दरवाढीविरोधात नेहमी केंद्र व राज्य सरकारवर टीका करणारा भाजपाचा सहकारी पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना शिवसेना भारत बंद मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

महागाईचा आगडोंब उसळला आहे. हे आम्ही पूर्वीपासून सांगत आहोत. आम्हाला जनतेच्या भावना माहीत आहेत. आम्ही जनतेसोबतच आहोत असे सांगत विरोधकांनी महागाईविरोधात खुशाल आंदोलन करावे. जेव्हा ते अपयशी ठरतील तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असे राऊत म्हणाले.