शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेच टाइमपास टोळी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली आहे. शिवसेनेकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवेसना वीरप्पन गँग असल्याची टीका केली होती. फेरीवाल्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवून खंडणी उकळण्याचं काम चालू असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. दरम्या यी टीकेला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मनसे ही संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

संदीप देशपांडेंनी काय म्हटलं आहे –
“वीरप्पनने जेवढं देशाला लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल. सन्माननीय बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी उकळणार असाल तर शिवसेनेला यापुढे बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा किंवा नाव घेण्याचाही अधिकार उरत नाही,” असं संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.