इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला मिळावी यासाठी अनेकदा विविध पक्ष संघटनांनी आंदोलने केली आहेत. पण सोमवारी झालेल्या आरपीआयच्या जेलभरोला विशेष महत्त्व होते. कारण महायुतीतील सेना-भाजप हे दोन्ही पक्षही पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात सहभागी होणार, अशी घोषणा करण्यात आली होती. पण सेनेचे नेते सोडाच; एकही शिवसैनिकदेखील या आंदोलनाकडे फिरकला नाही.
इंदू मिल आंदोलनात अग्रभागी राहण्यासाठी आरपीआयने आंदोलनाचा झपाटाच लावला आहे. १५ ते २२ ऑक्टोबपर्यंत राज्यभर जेलभरोची घोषणा त्यांनी केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे एरवी कधीही इंदू मिलच्या आंदोलनात रस्त्यावर न उतरणारी शिवसेना-भाजप युती या जेलभरोते सहभागी होईल, अशी हवाही होती. शिवसेनेचे सुभाष देसाई आणि भाजपाचे विनोद तावडे यांची नावे झळकली होती. भाजपने आपला शब्द पाळला पण शिवसेनेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या वार्डामध्ये झालेल्या आंदोलनाला शेवाळे तर सोडाच; साधा शिवसैनिकही फिरकला नाही.
पुढील सर्व आंदोलनात शिवसेना नेते आमच्या सोबत असतील, असे सांगत रामदास आठवलेंनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण इंदू मिल मुद्दय़ावर दोन्ही पक्षांत तीव्र मतभेद असल्याचे आरपीआयचे नेते खासगीत कबुली देत होते. शेवाळे यांनी मात्र दावा केला की, या आंदोलनाबाबत कुठलीही माहिती आरपीआयकडून मिळाली नाही अथवा आमच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले नाही.
नाही सांगत जा!
यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता आमचे याबाबत बोलणे झाले आहे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगणे महत्त्वाचे नाही, असे ते म्हणाले.