दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आलेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा या मागणीसाठी होते असा दावा केला.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरचं पोस्टर झळकावण्यात आलं. मी पेपरमध्ये वाचलं त्यानुसार इंटरनेट, मोबाइल आणि इतर गोष्टींवर लावण्यात आलेली बंदी उठवावी अशी मागणी त्यांनी केली आहे”. पुढे बोलताना त्यांनी जर भारतात कोणी काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याची मागणी केली तर सहन केली जाणार नाही असंही म्हटलं आहे.

रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात
जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात अशा शब्दांत टीका केली. तसंच गेट वे ऑफ इंडिया येथून विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं नसून त्यांची आंदोलनाची जागा फक्त बदलली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.