गेले काही महिने विरोधी पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात गांधी कुटुंबदेखील आहे. इतर नेतेही आहेत, आम्हीदेखील आहोत. असे किती प्रयत्न केले तर भविष्यात विरोधी पक्ष एकजुटीने उभा राहील, संघर्ष करेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी देशाचा इतिहास पाहिला पाहिजे. विरोधी पक्ष आज दुबळा वाटत असला तरी अचानाक फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो आणि ताकद दाखवतो”.

“काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. गावागावत पोहोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि इतरांनीही देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे. त्या पक्षाचं अध्यक्षपद हे देशातील आणि राजकारणातील एक महत्वाचं पद आहे. अशा काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरुन बोलणं आपली संस्कृती नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही नाही का जो पक्षाचं नेतृत्व करेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हा प्रश्न आपण भाजपाबद्दल विचारला तर आजही नरेंद्र मोदीच नेते आहेत. पक्षात लोकशाही असल्याचं सांगत असले तरी ती कोणाच्या नावावर चालत आहे हे सर्वांना माहिती आहे”.

पुढे त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच्या नावाने पक्ष चालतो. प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो. तो चेहरा म्हणजे घराणेशाही नाही. कुटुंबानेही पक्ष उभा करण्यासाठी खूप त्याग केलेला असतो. यामध्ये गांधी कुटुंबही आहे. जर लोकांना गांधी कुटुंबच नेतृत्व करु शकतं असं वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे. त्यात आम्ही बोलण्याची गरज नाही”.

“अंतर्गत वाद सर्व पक्षांमध्ये होत असतात . समाजवादी, जनता दल युनायटेमध्येही अंतर्गत वाद आहेत. आम्ही तर म्हणतो हीच लोकशाही आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.