पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी यामध्य नरेंद्र मोदींची काही चूक नसल्याचं म्हटलं आहे. “नरेंद्र मोदींना कधी विष्णूचा अवतार म्हणतात, कधी छत्रपती शिवरायांशी तुलना केली जाते. पंतप्रधानांना याबद्दल काही माहिती असेल असं वाटत नाही. त्यांचा यामध्ये काही दोष नाही. ही चमचेगिरी असून भक्तच नेत्यांना संकटात आणतात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही
नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदीच आहेत. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. पण छत्रपती सर्वांच्या वर आहेत असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. कर्तबगार नेते आहेत. आम्हाला आदर आहे, त्यांचा मान करतो. पण कितीही मोठा नेता असला तरी महाराजांशी तुलना करणं योग्य नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

बरं झालं आपल्या हातून स्मारक बांधलं गेलं नाही
“महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. नरेंद्र मोदींशी महाराजांची तुलना करणं राज्यातील भाजपा नेत्यांना मान्य आहे का ? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं. तुम्हा पाच वर्ष राज्यकर्ते होतात. आपण शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधायला निघाला होता. बरं झालं आपल्या हातून ते स्मारक बांधलं गेलं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भूमिका घ्या म्हटलं तर चिडण्याचं कारण नाही
आपल्या आधीच्या वक्तव्यासंबंधी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ‘महाराजांचे जे वंशज आहेत ते सगळे भाजपात आहेत. मग कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांची जी तुलना केली आहे ती योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या म्हटलं तर चिडण्याचं कारण नाही. महाराजांचे वंशज आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये असं आहे का? महाराजांची अशा पद्धतीने तुलना केल्याबद्दल तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला हवे,” असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी माडलं.

आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवे – संजय राऊत

उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा
यावेळी संजय राऊत यांनी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंबंधी सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं. “मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी आज सकाळी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी आपली भूमिका योग्य असल्याचं सांगितलं आहे. जनता भूमिका घेत असेल तर वंशजांनीही भूमिका घेतली पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपा नेते संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

जय भगवान गोयल यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता
हे वादग्रस्त पुस्तक लिहिणाऱ्या जय भगवान गोयल यांच्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. “१५ वर्षापूर्वी दिल्लीत महाराष्ट्र सदनावर त्यांनी हल्ला केला होता. सदनाचा चक्काचूर करत महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली होती. त्यांना आव्हान देणारा मी पहिला खासदार होतो. त्यांना पळवून लावलं होतं. महाराष्ट्राचा अपमान केला तो महाराजांचाही अपमान करतो आणि त्यावर महाराष्ट्रातील नेते अवाक्षर काढायला तयार नसतील महाराष्ट्राचं राजकारण करण्याचा अधिकार नाही. महाराजांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.