गेल्या दोन वर्षांपासून परदेश दौरे करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली दुनियादारी निरर्थक ठरल्याची टीका शिवसेनेने केली आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत, पण पाकिस्तानला मिळणारी मदत पाहता एकटे कोण पडले असा खोचक सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
उरी हल्ल्यावरुन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उरी हल्ल्यानंतर जगभरातील एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. प्रत्येकाने दहशतवादाचा तोंडदेखला निषेध केला असे निदर्शनास आणून देत यावरुन गेल्या दोन वर्षांत मोदींची सुरु असलेली दुनियादारी निरर्थक ठरली अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. सोशल मीडियावर भाजप समर्थकांनी केंद्र सरकारने पाकिस्तानला कसे एकटे पाडले याचा थापा मारल्या,पण प्रत्यक्ष स्थिती वेगळीच होते असे शिवसेनेने उदाहरणासह सांगितले. उरी हल्ल्यानंतर रशियाने पाकिस्तान सैन्यासोबतचा युद्ध अभ्यास रद्द केल्याचे सांगितले गेले, पण प्रत्यक्षात रशियाची तुकडी युद्ध अभ्यासासाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाली आणि ही भारतासाठी चपराक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. उरी हल्ल्यानंतर चीन पाकिस्तानवर नाराज असल्याचे सांगितले गेले. पण परदेशी आक्रमण झाल्यास चीनने पाकिस्तानच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले अशी आठवण शिवसेनेने करुन दिली. या सर्व घटनांवरुन नाती आणि दुनियादारीपेक्षा प्रत्येकजण आपला स्वार्थ आणि धंदा बघतो असे शिवसेनेने म्हटले आहे.
इस्लामी राष्ट्र संघटनेनेने काश्मीरप्रश्नी पाकला पाठिंबा दिला, मग मोदींनी अरब राष्ट्रात जाऊन जी दुनियादारी केली त्याचा उपयोग काय असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला. १९७१ च्या बांगलादेश युद्धात रशियाने इंदिरा गांधीच्या मदतीला म्हणजे भारतासाठी सातवे आरमार पाठवून मैत्री निभावली होती, तशी मैत्री निभावताना आज कोण दिसत नाही असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे. पाकिस्तानची मुजोरी आणि शिरजोरी वाढली आहे. पाकिस्तानपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतच एकटा पडू लागला की काय अशी भीती वाटू लागली आहे असे म्हणत शिवसेनेने मोदी सरकारच्या परदेश धोरणावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
काश्मीरमधील अत्याचारांमुळे उरी हल्ला जाला असे पाकिस्तानचे पंतप्रधान सांगतात, म्हणजेच पाकने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, नवाझ शरीफ यांची छाती छप्पन इंच फुगली काय असा सवालही सेनेने उपस्थित केला. उरी हल्ल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली असून आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.