छगन भुजबळ यांना करण्यात आलेली अटक म्हणजे काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड असल्याची झोंबरी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर भुजबळांनी सरकार माझ्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, भुजबळांनी राजकीय सूडावर आक्रोश करण्याचा हक्क केव्हाच गमावल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील आजच्या अग्रलेखात म्हटले आहे. यासाठी अग्रलेखात भुजबळ गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेचा दाखला देण्यात आला आहे. भुजबळ गृहमंत्री असताना त्यांनी काही करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात पाठवण्याचा विडाच उचलला होता. तेव्हा भुजबळ यांनी केला व तेसुद्धा राजकीय सूड आणि व्यक्तिगत द्वेषाचेच राजकारण होते. शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी केंद्रातून पोलिसी बळ, निमलष्करी दलाच्या तुकड्या मागवल्या. पण शिवसेनाप्रमुखांच्या अटकेच्या आगीत शेवटी भुजबळ यांचेच हात भाजले. शिवसेनाप्रमुख अग्निदिव्यातून अधिक उजळून तेजाने बाहेर पडले. त्यामुळे राजकीय सूडावर आक्रोश करण्याचा हक्क भुजबळांनी गमावल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. याशिवाय, गृहमंत्री म्हणून भुजबळांनी अनेकांना तुरुंगात पाठवले. ज्यांनी त्यांचे ऐकले नाही अशा अनेकांना खोटी प्रकरणे तयार करून, पोलिसी यंत्रणेचा गैरवापर करून तुरुंगात पाठवले, असे सांगत सेनेकडून भुजबळांवर आसूड ओढण्यात आले आहेत.
भुजबळांविरोधात राजकीय सूडभावनेने कारवाईची शंका – शरद पवार