बोरिवलीतील प्रकार; धोरण निश्चित नसल्याने कारवाई नाही
मुंबई महापालिकेचे फेरीवाल्यांविषयीचे धोरण निश्चित नसल्याचा फायदा फेरीवाल्यांबरोबरच दुकानदारही घेत असून अनेक ठिकाणी विशेषत: रेल्वे स्थानकांबाहेरील परिसरात फेरीवाल्यांना हटविण्याच्या नावाखाली दुकानदार रस्ते आणि पदपथ आपली मालमत्ता असल्याप्रमाणे काबीज करीत आहेत. फेरीवाले आपले ठेले टाकून तर दुकानदार ‘नो पार्किंग’चे अडथळे उभारून आपापल्या परीने पदपथ आणि रस्ते अडवीत आहेत. दुकानदार आणि फेरीवाले या पद्धतीने सार्वजनिक जागेवर हक्क सांगू लागल्याने सामान्य मुंबईकरांना मात्र पदपथावरून साधी चालण्याची किंवा गाडी उभी करण्याचीही ठिकठिकाणी चोरी झाली आहे.
फेरीवाले प्रवेशद्वार अडवून बसतात आणि त्याचा व्यवसायावर परिणाम होतो म्हणून आम्ही हे अडथळे टाकतो, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यासाठी कधी दुकानासमोरच्या पदपथावर बांधकाम करून तर कधी रस्त्यावरील मोकळ्या जागेत ‘नो पार्किंग’चा फलक लावून वा चक्क मोठाले लोखंडी अडथळे टाकून रस्ते अडविले जात आहेत. यामुळे फेरीवाले आणि दुकानदार असा वाद तर उद्भवतो. गेल्या काही वर्षांमध्ये दादर, मालाड पाठोपाठ पश्चिम उपनगरातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आलेल्या बोरिवलीत तर ही भांडणे कित्येकदा हाणामारीपर्यंत जातात.
शिवाय दुकानदार आणि फेरीवाल्यांनी आपापल्या परीने रस्ते आणि पदपथ अडवून ठेवल्याचा फटका पादचाऱ्यांना आणि रहदारीला बसतो. बोरिवली रेल्वे स्थानकाला समांतर असलेला स्वामी विवेकानंद मार्गावर (एस. व्ही. रोड) कायम वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. पदपथ आणि रस्ते दोन्ही फेरीवाल्यांनी अडवून ठेवल्याने पादचाऱ्यांना चालणे दुरापास्त होते, तर दुकानासमोर गाडी उभी करू पाहणाऱ्या चालकांशीही दुकानदारांचे वाद होतात. आता तर येथील दुकानदारांनी फेरीवाल्यांना मज्जाव करण्याकरिता ‘स्वच्छ मुंबई’च्या नावाखाली दुकानाबाहेर ‘नो पार्किंग’चे मोठाले लोखंडी अडथळे टाकून सार्वजनिक जागाच अडवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार केवळ बोरिवलीतच नव्हे तर शहरात सर्वत्र दिसून येतो आहे.

यंत्रणा हतबल
‘फेरीवाल्यांवर कारवाई करायची झाल्यास आम्ही वेळोवेळी सुरक्षा पुरवितो. आमची भूमिका इतपतच सीमित आहे,’ असे पोलिस उपायुक्त (परिमंडळ ११) विक्रम देशमाने यांनी सांगितले. तर केंद्र सरकारच्या फेरीवाल्यांसंदर्भातील कायद्यावरून पालिकेला आपले धोरण निश्चित करायचे आहे. मात्र ते अद्याप निश्चित नसल्याने आम्हाला त्यांच्यावर कारवाई करताना मर्यादा येतात, अशा शब्दांत येथील पालिका साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी आपली अडचण सांगितली. अर्थात दुकानदारांनी रस्त्यावर ‘नो पार्किंग’चे अडथळे टाकणे चुकीचे असून असे काही आढळून आल्यास निश्चितपणे कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

रस्त्याला लागून असलेल्या दुकांनाबाहेरच नव्हे तर मोक्ष, गोयल, इंद्रप्रस्थ आदी शॉपिंग सेंटरची प्रवेशद्वारेही फेरीवाले अडवितात. त्यांनी व्यवसाय करू नये असे आमचे म्हणणे नाही. परंतु त्यांच्या रस्ते अडवून बसण्याच्या प्रकारामुळे आमच्याही धंद्यावर गदा येते. त्यामुळे त्यांना त्यांच्या बसण्याच्या जागा ठरवून देण्यात याव्या. जेणेकरून दुकानदार आणि फेरीवाले असे वाद होणार नाहीत.
– यतीन कदम, गोयल मार्केटमधील दुकानदार

बोरिवलीत फेरीवाल्यांमुळे वारंवार कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असतो, हे खरे आहे. फेरीवाले शहराची गरज आहे, परंतु त्यांनी नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करावा. त्यामुळे आपण फेरीवाले, दुकानदार आणि पालिका प्रशासन यांच्याशी बोलून याप्रकरणी तोडगा काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू.
– गोपाळ शेट्टी, खासदार, उत्तर मुंबई.