केंद्र सरकारने देशभरातील शहरांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेअंतर्गत सर्वात सुखदायक आणि आनंदी शहरासाठी १ फेब्रुवारीपासून सर्वेक्षण सुरू आहे. मुंबईला नामांकन मिळावे म्हणून मुंबईकरांनाही या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ ७ हजार ३०० मुंबईकरांनी, तर गुजरातच्या सुरत शहरातील तब्बल ८७ हजार जणांनी या सर्वेक्षणात सहभा नोंदवला आहे. देशभरातील विविध शहरे व महानगरांमध्ये राहण्यास सुखकर/उत्तम शहर कोणते, याची निवड करण्यासाठी केंद्र सरकारच्या आवास व नागरी कार्य मंत्रालयाने निकष निश्चित केले आहेत. या निकषांनुसार नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये मुंबईकरांनी सहभाग घेऊन खरोखर मुंबई हे आनंदी शहर आहे काय, याचा विचार करून शेरा द्यायचा आहे. मात्र घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावणाऱ्या मुंबईकरांनी या सर्वेक्षणाकडे पाठ फिरवली आहे. या सर्वेक्षणात सुरतमधील ८७ हजार जणांनी मतदान केले आहे, तर अहमदाबादमधील ७७ हजार जणांनी सहभाग घेतला आहे. मत नोंदविण्यासाठी.. : राहण्यास सुखकर शहर निश्चित करण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये सुमारे ११५ मोठय़ा शहरांचा समावेश असून, त्यातून मुंबईचा क्रमांक ठरणार आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहणार असून या संकेतस्थळावर मत नोंदविता येणार आहे.