‘सोल्युशन्स ग्रुप ऑफ इंडिया’चा दावा; नुकसान भरपाईसाठी नोटीस मुंबई : मुंबईतील सहार येथील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमधील निकृष्ट अन्नामुळे विषबाधा झाल्याने सहा डॉक्टरांची प्रकृती बिघडल्याचा आरोप करत सोल्युशन्स ग्रुप ऑफ इंडियाने नुकसान भरपाईची मागणी हॉटेलकडे केली आहे. तसेच संस्थेने कायदेशीर नोटीस देखील पाठविली आहे. संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी १९ ते २१ एप्रिल या दरम्यान सहार येथील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये राहण्यासह जेवणाची सुविधा केली होती. यासाठी जगभरातून जवळपास दोन हजार डॉक्टर उपस्थित होते. २० एप्रिलच्या रात्री काही डॉक्टरांनी अन्न शिळे असल्याचे संस्थेला कळविले. त्यावेळी शेफने सर्व जेवण दर्जेदार असल्याचा दावा केल्याने सर्वजण जेवले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सहा डॉक्टरांची अन्नातून विषबाधा झाल्याने प्रकृती बिघडली. अन्य डॉक्टरांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असली तरी त्रिवेंद्रमहून आलेल्या डॉ.ज्योतिदेव यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. याप्रकरणी वारंवार हॉटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांनी माफी मागितली नसून यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, असे या पत्रकात मांडले आहे. कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च १ कोटी ५० लाख हॉटेलने परत करून माफी मागावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. कोणतीही कायदेशीर नोटीस अद्याप आम्हाला प्राप्त झालेली नाही. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छ आणि दर्जेदार जेवण दिले जाते. संस्थेनेअसे आरोप करत हॉटेलची बदनामी केल्यास संस्थेवर कायदेशीर कारवाई करू, असे जे.डब्ल्यू. मॅरिएटचे महाव्यवस्थापक डिटमर किनहॉफर यांनी सांगितले.