छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले आहेत. इमारतीत अडकलेल्या २३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं असून अद्यापही बचावकार्य सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टपाल मुख्यालयाजवळील पाच मजली ‘भानुशाली’ इमारतीचा काही भाग लगतच्या लकी हाऊस, गणेश चाळीवर कोसळला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली होती. रात्रभर सुरु असलेलं बचावकार्य अजूनही सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत उपकरप्राप्त इमारत होती. जर्जर झालेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘म्हाडा’कडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आले होते. पालिकेकडूनही आवश्यक ती परवानगी देण्यात आली होती. या इमारतीचे १ एप्रिलपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार होते. परंतु टाळेबंदीमुळे हे काम सुरू होऊ शकले नाही, असं स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आलं. #UPDATE: One more body recovered from the site of building collapse, death toll rises to 6. Rescue operation still underway: National Disaster Response Force (NDRF) pic.twitter.com/juJWEIZlmB — ANI (@ANI) July 17, 2020 जर्जर झालेली ही इमारत त्वरित रिकामी करण्याची गरज होती. मात्र तरीही रहिवासी या इमारतीत वास्तव्यास होते, असे आसपासच्या इमारतींमधील रहिवासी सांगत होते. इमारतीचा एका बाजूचा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि प्रचंड मोठा आवाज झाला. आवाज ऐकून या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक रहिवाशांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची अग्निशमन दलाला माहिती दिली. या इमारतीचा एका बाजूचा संपूर्ण भाग कोसळला, तर दुसऱ्या भागात रहिवासी अडकले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब आणि आवश्यक वाहने घटनास्थळी दाखल झाली. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्यासाठी पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने ५० कामगारांची फौज उपलब्ध केली. कोसळणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता.