|| डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन पुणे : ‘ज्ञानोबा तुकोबा’ या दोन शब्दांमध्येच सकल संत परंपरा सामावली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासना पद्धती असलेल्या वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरी हा प्रमाणग्रंथ देण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले. तसेच अठरापगड जातीच्या लोकांसह स्त्री आणि शूद्रातिशूद्रांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राच्या संत परंपरेने केले, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी केले. मराठी भाषा आणि साहित्य घडविण्यामध्ये संत पंरपरेचा मोलाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले. ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब-व्याख्यानमालेमध्ये डॉ. मोरे यांचे व्याख्यान झाले. ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ हा विषय त्यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या मराठवाड्यातील संत बहिणाबाई सिवकर यांच्या अभंगाच्या निरूपणाच्या माध्यमातून उलगडला. वारकरी संप्रदाय हा एकट्याने उपासना करायचा संप्रदाय नाही. ही सामुदायिक उपासना आहे. ते पंढरपूरच्या वाटेवर गातात, नाचतात, खेळतात. परमात्म्याने मांडलेल्या खेळातील आपण खेळगडी आहोत अशी वारकऱ्यांची भावना असते. लुप्त होणारे खेळ पाहायचे असल्यास वारी पाहावी लागेल. वारी हा आनंदाचा उत्सव आहे, अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक आणि मोरे यांचा परिचय करून दिला. ‘लोकसत्ता’च्या भक्ती बिसुरे यांनी सूत्रसंचालन केले. म्हणून थोरपणा कमी होतो का? संत हे वैज्ञानिक नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहू नये. त्या त्या काळातील ज्ञानक्षेत्राच्या मर्यादा सर्वांनाच असतात. आइनस्टाइनला जे माहीत होते ते न्यूटनला ठाऊक नव्हते. म्हणून न्यूटनचा थोरपणा कमी होतो का? असा सवाल डॉ. मोरे यांनी केला. प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग सर्व्हिसेस, पुणे