नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांत येणाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे चार आणि पश्चिम रेल्वे आठ विशेष सेवा चालवणार आहे.
३१ डिसेंबरला सीएसटीहून शेवटची गाडी १.३० वाजता निघेल. कल्याणला जाणारी ही गाडी मध्यरात्री तीन वाजता पोहोचेल, तर कल्याणहून मुंबईला १.३० वाजता विशेष गाडी सोडण्यात येईल. ही गाडी मुंबईला ३.०० वाजता पोहोचेल. तर रात्री १.३० वाजता मुंबईहून एक गाडी पनवेलच्या दिशेने रवाना होणार आहे. ही गाडी पनवेलला २.५० वाजता पोहोचेल, तर पनवेलहून १.३० वाजता मुंबईला निघणारी गाडी मुंबईला २.५० वाजता पोहोचेल. पश्चिम रेल्वेवर चर्चगेटहून विरारला जाण्यासाठी चार विशेष गाडय़ा सोडल्या जातील. या गाडय़ा १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२० वाजता निघून अनुक्रमे २.४७, ३.३०, ४.००, ४.५५ वाजता विरारला पोहोचतील. विरारहून चर्चगेटला येणाऱ्या गाडय़ा १२.१५, १२.४५, १.४० आणि २.५५ वाजता सुटतील.