ठाणे येथील रेल्वे यार्डाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला असून कळवा आणि ठाणे दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
बुधवार-गुरवारच्या मध्यरात्री १२.५० ते सकाळी ४.५० या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या मार्गावर हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसहून ठाण्याकडे जाणारी १२.२५ वाजताची ठाणे गाडी तसेच ठाण्याहून सकाळी ४.४४ वाजताची गाडी रद्द करण्यात आली आहे. तर कर्जत, अंबरनाथ आणि टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडय़ा जलद मार्गावरून वळविण्यात आल्या असून त्या मुंब्रा आणि कळवा येथे थांबणार नसल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.