राज्य मंडळाचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन निवडणुकीच्या कामामुळे दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत असताना राज्य मंडळाने परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मंडळाने विद्यार्थ्यांना केले आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार बुधवारपासून सुरू झाली असून ती २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि कलचाचणी १५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत होणार आहे. मात्र सध्या कनिष्ठ महाविद्यालये, शाळांमधील शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या कामात गुंतले आहेत. परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पुरेसे शिक्षक आणि कर्मचारी नाहीत, बाह्य़परीक्षक मिळत नाहीत अशी तक्रार कनिष्ठ महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. त्या पाश्र्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांकडून आणि काही संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयटीसाठी बा परीक्षकांची नियुक्ती बारावीतील माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी आता बा परीक्षक नेमण्याचा निर्णय मंडळाने घेतला. याचबरोबर लेखी परीक्षेप्रमाणेच प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठीही भरारी पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी मंडळाच्य या दोन्ही निर्णयाचे स्वागत केले. प्रवेशपत्रांमध्ये चुका प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांमध्ये अडसर येत असतानाच प्रवेशपत्रांमध्ये चुका असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये विषयांमध्ये तर उत्तर लिहण्याच्या माध्यमामध्ये चुका असल्याचे समोर आल्याने गोंधळ उडाला आहे. काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर छायाचित्रच छापले गेले नसल्याचेही उघड झाले आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारपासून प्रवेशपत्राचे वाटप सुरू करण्यात आले. या वेळी बहुतांश विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात विषय चुकविण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहेत. याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर परीक्षेचे माध्यमही चुकविण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर छायाचित्र छापण्यात आले नाही. यामुळे आता विद्यार्थ्यांना या चुका दुरुस्त करण्यासाठी वेळ खर्च करावा लागत आहे. यासंदर्भात मुंबई विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधला असता, कोणत्याही विद्यार्थ्यांची तक्रार आपल्यापर्यंत आलेली नसल्याचे सांगण्यात आले. प्रवेशपत्रांमध्ये काही चुका असल्यास विद्यार्थ्यांनी मंडळांकडे संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाशी चर्चा करूनच परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ज्या ठिकाणी शिक्षकांची कमरता जाणवेल तेथे पर्यायी शिक्षक दिले जातील. - विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री