एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षभरात १,३०० नवीन बसगाडय़ा दाखल होणार आहेत. महामंडळाने राज्य शासनाकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला असून राज्याच्या अर्थसंकल्पातही त्याची तरतूद केली जाईल. परंतु महामंडळाला दोन हजारांपेक्षा जास्त बसगाडय़ांची गरज असतानाही तुलनेने कमी बस  दाखल होतील.

राज्याच्या २०२०च्या अर्थसंकल्पात १,५०० पर्यंत बसची तरतूद करण्यात आली होती. परंतु मार्च महिन्यापासून सुरू झालेली टाळेबंदी व शासन आणि एसटी महामंडळाचीही आर्थिक स्थिती बिकट झाल्याने बस ताफ्यात येऊ शकल्या नाहीत. पुन्हा मागचाच प्रस्ताव सुधारित करताना त्यात १,३०० बसच एसटीला मिळतील. साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बस होत्या. बसची कालमर्यादा संपल्याने दरवर्षी भंगारात जाणाऱ्या गाडय़ांची संख्या अधिक असते. त्यानुसार नवीन बसची खरेदी होते. परंतु करोना काळात ती फारशी होऊ न शकल्याने एसटीच्या ताफ्यातील संख्या १५,८०० पर्यंत पोहोचली. जानेवारी २०२० पर्यंत फक्त ७०० पर्यंत नवीन एसटी बस दाखल झाल्या होत्या. सध्या एसटीची प्रवासी संख्या २३ ते २४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. करोनाकाळाआधी दररोज ६० ते ६५ लाख प्रवासी प्रवास करत होते.

* एसटीची प्रवासी संख्या – २३ ते २४ लाख

* बसगाडय़ा – १५,८०० पैकी १४ हजार बस धावतात

* उत्पन्न – दररोज १२ कोटी ५० लाख रुपये

१५ हजार ८०० एसटी बसमध्ये १४ हजार लाल रंगाच्या साध्या बस असून उर्वरित वातानुकूलित शिवशाही बस, शिवनेरी बस, अश्वमेध, विनावातानुकूलित शयनयान बस आहेत.

एसटी महामंडळ १,३०० नवीन बस खरेदी करणार असून यात सर्व प्रकारच्या बसचा समावेश असेल. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पातही त्याची तरतूद होईल.

अनिल परब, परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष