‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’चा पुढाकार

मुंबई : ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’कडे (एमटीडीसी) असलेल्या मोकळ्या जमिनी आणि मालमत्ता भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) विकसित करून राज्यातील काही निवडक पर्यटनस्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार चार आणि पाच तारांकित हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटक कं पन्या यांच्याबरोबर भागीदारी करण्यात येणार असल्याची माहिती ‘एमटीडीसी’ने दिली.

‘एमटीडीसी’कडे राज्यभर निसर्गरम्य व प्रेक्षणीय ठिकाणी पर्यटक निवासे आणि मोकळ्या जागा आहेत. या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्या आणि स्थानिक व्यावसायिक, युवकांना रोजगार उपलब्ध होऊन पर्यटनस्थळाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी ‘एमटीडीसी’ने पुढाकार घेतला आहे. याठिकाणी पंचतारांकित दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येतील. त्यामुळे देशी-परेदशी पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांविषयी आकर्षण निर्माण होऊन पर्यटन विकसित होईल.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि मालमत्ता भागिदारी तत्त्वावर (पीपीपी) विकसित करण्यात येणार आहेत. राज्यातील काही निवडक पर्यटनस्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येईल. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याने पर्यटनासाठी संधी उपलब्ध होणार आहेत. मनोरंजन पार्क, साहसी क्रिडा, वॉटर पार्क आदी विकसित होणार आहेत. महाराष्ट्राची लोककला, खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गसंपन्न डोगररांगा या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणावर विकसित होण्यास मदत होईल.

शासकीय जमिनी, मालमत्तांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पीपीपी, खासगी सहकार्याने, प्रवर्तन आणि व्यवस्थापन करार किंवा फक्त व्यवस्थापन करार इत्यादी उपलब्ध विविध पर्यायांचा विचार करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार या मालमत्तांचा विकास करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून त्यांची माहिती http://www.mahatenders.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पहिल्या टप्प्यात माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, ताडोबा

प्रथम टप्प्यामध्ये माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर येथील पर्यटक निवास, मिठबांव रिसॉर्ट आणि सिंधुदुर्ग येथील मोकळी जागा, तसेच ताडोबा आणि फर्दापूर येथील मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यटन क्षमतेचा विचार करुन अन्य ठिकाणांची निवड करुन सरकारच्या मान्यतेने त्यांचा विकास करण्यात येणार आहे.

मरगळ दूर होण्यास मदत

पर्यटन क्षेत्रात सध्या करोनामुळे आलेली मरगळ या निर्णयामुळे कमी होणार असून पर्यटन क्षेत्र नव्याने उभारी घेईल. पर्यटकांना पंचतारांकित सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक व्यावसायिक, टुर ऑपरेटर, ट्रॅव्हल कंपन्या आणि स्थानिक उत्पादनांना नव्याने बाजारपेठ मिळेल, असा विश्वास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी व्यक्त केला.