सध्या शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांत आता सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, गुगलचे भारतातील विक्री प्रमुख संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या उपक्रमासाठी शासनाने गुगलबरोबर करार केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोठेही, कधीही शिकता येऊ शकेल. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच शिक्षक या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतील, त्यांना प्रकल्प देऊन त्याचे मूल्यमापनही करू शकतील. आता पर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली आहे.

‘या संकटकाळात शिक्षणाबाबत उद्भवलेल्या समस्येला शिक्षण विभागाने डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करून संधीत रूपांतर केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही यामुळे दर्जेदार शिक्षणाची संधी मिळेल,’ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

‘सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

भविष्यातील शिक्षण कसे असेल याची जाणीव सद्य परिस्थितीने करून दिली आहे. आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्न काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले आहे.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री