शासनाने नव्याने लागू केलेल्या कठोर निर्बंधांविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी गुरुवारी राज्यभरात आंदोलन केले. ‘युनायटेड हॉस्पिटॅलिटी फोरम ऑफ महाराष्ट्र’ या छत्राखाली हॉटेल व्यावसायिकांच्या सर्व संघटना एकत्र आल्या असून त्यांनी या मिशन रोजी-रोटी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

नव्याने लागू केलेल्या निर्बंधांनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटना केवळ घरपोच पदार्थ पुरवण्याची सेवा सुरू ठेवता येईल. त्याशिवाय ‘शनिवार- रविवार या महत्त्वाच्या दिवशी संचारबंदी असल्याने या व्यवसायाचे मोठे नुकसान होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. ‘पदार्थ घरपोच देणे हे आदरातिथ्य क्षेत्राचे काम नाही. या सेवातून केवळ ७ ते ८ टक्के उत्पन्न मिळू शकते. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवायचे असतील तर वीज देयक, पाणी देयक, जागेचे भाडे, उत्पादन शुल्क व इतर शुल्कही माफ करावे,’ अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

घरपोच सुविधेवर हा व्यवसाय चालत नाही. या निर्बंधांमुळे आदरातिथ्य क्षेत्र ९० टक्के ठप्प झाले आहे,’ असे फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी सांगितले. हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनीही शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला असून ‘हे निर्बंध नसून टाळेबंदीच आहे. गेल्या टाळेबंदीत आमचे क्षेत्र १० महिने पूर्णत: बंद होते. त्या वेळी सरकारने कोणतीही सवलत दिली नाही. राज्यभरात १० हजार ५०० हॉटेल, २ लाख १० हजार रेस्टॉरंट तर ३० लाख कर्मचारी आहेत. त्यामुळे या क्षेत्रांचे होणारे नुकसान सरकारने गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे,’ असे त्यांनी सांगितले.

दुकाने सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

मुंबई : करोनाची साखळी तोडण्याकरिता जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी विरोध केलो आहे.  त्यानुसार शुक्रवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर अ‍ॅफ कॉमर्सने दिला होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे सोमवारपासून सर्व दुकाने सुरू के ली जातील, असे अध्यक्ष संतोष मंडलेचा व उपाध्यक्ष ललित गांधी यांनी जाहीर केले.

सरकारने दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला तरी शुक्रवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांच्या संघटनेने हा निर्णय तीन दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसारच शुक्रवारी दुकाने सुरू करण्याचे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. याऐवजी सोमवारपासूनरर्व दुकाने सुरू केली जातील, असे ललित गांधी यांनी सांगितले.