राज्याच्या आरोग्य विभागात डॉक्टरांची हजारो पदे भरण्यातच आली नसल्याने त्याचा फटका आरोग्य विभागाच्या सर्वच कार्यक्रमांना मोठय़ा प्रमाणात बसत असून गेल्या तीन वर्षांत पुरुष व स्त्री नसबंदीच्या आकडेवारीतही सातत्याने घट होत आहे. आरोग्य विभागाने निश्चत केलेल्या नसबंदी शस्त्रक्रिया उद्दिष्टाचा विचार करता अवघे तीन टक्के पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आरोग्य विभागाला ‘यश’ आल्याचे दिसून येते. पुरुष नसबंदी करणाऱ्या व्यक्तीला १३०० रुपये तर स्त्री नसबंदीसाठी ६०० रुपये देण्यात येतात. दारिद्रय़ रेषेखालील महिलांनी तसेच मागासवर्गीय महिलांनी खाजगी रुग्णालयांमध्ये नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास १३५० रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे ‘सावित्रीबाई फुले कन्या कल्याण’ योजनेअंतर्गत दारिद्रय़ रेषेखालील जोडपे ज्यांना मुलगा नाही व दोन मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या व्यक्तीस दोन हजार रुपये व मुलींच्या नावे आठ हजार रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात येते. तथापि सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेलाही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे १८४५, ११२७ आणि १२२१ लोकांनीच प्रतिसाद दिला आहे. कुटुंबनियोजनाचा उपक्रम राबविण्यासाठी आरोग्य विभागाकडून शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजनही केले जाते. मात्र या कार्यक्रमाला गती देण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. डॉक्टरांची पुरेशी संख्या नसणे तसेच नियोजनातील त्रुटी यामुळे पुरुष व स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेतही गेल्या तीन वर्षांत सातत्याने घसरण होत आहे. नसबंदी शस्त्रक्रियेसह कुटुंब नियोजनाच्या वेगवेगळ्या उपक्रमांना व्यापकता देऊन लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाने मुळातच यासाठीचे उद्दिष्ट अवघे ५लाख ६० हजारएवढे ठेवले असतानाही २०१६-१७ मध्ये १३,९२४ पुरुषांनीच ही शस्त्रक्रिया करून घेतली. त्या आधीच्या दोन वर्षांमध्ये अनुक्रमे १४,९७५ व १४,८२१ लोकांनी ही नसबंदी शस्त्रक्रिया केली होती. नसबंदीच्या एकूण झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये हे प्रमाण अवघे तीन टक्के एवढे आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असली तरी गेली तीन वर्षे त्यातही सातत्याने घसरणच होत आहे. २०१४-१५ मध्ये चार लाख ५७ हजार महिलांनी शस्त्रक्रिया केली तर गेल्या वर्षी हीच संख्या चार लाख ३८ हजार एवढी खाली आली.