गुन्हेगार प्राचार्याना पाठीशी घातल्याचे प्रकरण मुंबई : हाणामारीच्या गुन्ह्यत ४४ दिवसांचा तुरुंगवास होऊनही प्राचार्याच्या कृत्याकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे आरोप महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी केले आहेत. प्राचार्याचे निलंबन होत नसल्याने महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांने कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी विद्यापीठ परिसरात उपोषण सुरू केले आहे. काही वर्षांपूर्वी प्राचार्यपदाच्या वादातून या महाविद्यालयात रक्तरंजित हाणामारी झाली होती. त्यावेळी महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना ४४ दिवसांची पोलीस कोठडीदेखील झाली होती. शिवाय भ्रष्टाचार आणि अन्य १४ गुन्हे त्यांच्यावर असूनही त्यांना प्राचार्यपदावरून पदच्युत केले जात नसल्याने महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांने उपोषणाची भूमिका घेतली. विद्यापीठाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नाही. महाविद्यालयात अनेक नियमबा गोष्टी चालतात. याकडे विद्यापीठ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. विद्यापीठ जोवर कारवाई करत नाहीत, तोवर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय माजी विद्यार्थी आनंदराज घाडगे याने घेतला आहे. महाविद्यालयाच्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनतर्फे हे उपोषण होत असून अन्य काही मागण्यांचे पत्रही विद्यापीठाला देण्यात आले आहे.