वसतिगृहातच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांची खंत; मन रमवण्यासाठी मोबाइल ते मेडिटेशन

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : करोनावर नियंत्रण आणण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यापूर्वीच राज्य सरकारने मुंबईतील सर्व विद्यार्थी वसतिगृहे रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या वेळी काही कारणांमुळे घरी जाता न आल्यामुळे अडकलेले अनेक विद्यार्थी आजही वसतिगृहात दिवस ढकलत आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ म्हणजे, आपापल्या गावी परतून आईवडील, कुटुंबीय, मित्र, आप्तेष्ट यांच्यासमवेत महिना घालवण्याची संधी असते. मात्र करोनाच्या टाळेबंदीमुळे या विद्यार्थ्यांना आता ती संधी पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यातच मिळण्याची शक्यता आहे.

वसतिगृहाच्या चार भिंतींत अडकून पडल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याची जाणीव असल्यानेच अनेक विद्यार्थी मन रमवण्यासाठी वेगवेगळे पर्याय अजमावत आहेत. यापैकी कुणी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत तर कुणी मोबाइल गेममध्ये विरंगुळा शोधत आहे.

विल्सन महाविद्यालयाच्या मॅकीकन हॉल वसतिगृहात २० विद्यार्थी आणि पंडिता रमाबाई वसतिगृहात ३ विद्यार्थिनी सध्या वास्तव्यास आहेत. यातील बहुतांश जण ईशान्य भारतातील आहेत. २६ मार्चनंतर ते आपल्या घरी जाणार होते. मात्र त्याआधीच टाळेबंदी झाली आणि त्वरित गावी जाण्याची सोय होऊ शकली नाही. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महाविद्यालयाने सगळी बडदास्त ठेवली आहे. ‘विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून खानावळीतील १० कर्मचारीही आपल्या घरी गेलेले नाहीत. जेवताना विद्यार्थ्यांना आवश्यक ते अंतर ठेवून बसवले जाते. वेळ घालवण्यासाठी विद्यार्थी ऑनलाइन गेम खेळतात, परदेशी भाषा शिकतात. महाविद्यालयातर्फे  त्यांचे ऑनलाइन समुपदेशन के ले जाते. अधूनमधून पालिके चे कर्मचारीही वसतिगृहाला भेट देतात,’ अशी माहिती वॉर्डन आशीष उजगरे यांनी दिली.

‘एलएलएमची परीक्षा तोंडावर होती. काहीच दिवसांची टाळेबंदी आहे. उगाच ये-जा करण्यापेक्षा वसतिगृहात राहून अभ्यास करू असे वाटले. म्हणून आम्ही गावी गेलो नाही. पण टाळेबंदी वाढतच गेली आणि परीक्षाही पुढे गेली. याचा सर्वाधिक त्रास पुनर्परीक्षा (के टी) देणाऱ्यांना होईल. टाळेबंदी संपल्यानंतर पहिल्या सत्राची पुनर्परीक्षा आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा एकत्र द्यावी लागेल. लगेच तिसरे सत्रही सुरू होईल. काही वस्तू हव्या असतील तर आम्ही वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकांना सांगतो.  खानावळही सुरू असल्याने जेवणाची सोय होतेय. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून आम्ही सर्व मुले चर्चा, वाचन, बातम्या बघणे, अभ्यास यांत वेळ घालवतो,’ असे चेंबूरच्या संत एकनाथ शासकीय वसतिगृहात राहणारा बुद्धभूषण कांबळे सांगतो.

सावित्रीदेवी फु ले महिला छात्रालय येथे राहणारी उत्तर प्रदेशची चित्राक्षी दुबे सांगते, ‘आम्ही इंटर्नल परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहात होतो. वसतिगृह सोडण्याची सूचना देण्यात आली त्या वेळी ट्रेनचे तिकीट मिळू शकले नाही. एरव्ही साडेचार हजारांच्या आसपास असणारे विमानाचे तिकीट १२-१३ हजारांवर पोहोचले. टाळेबंदी वाढणार याची कल्पना होती; पण करोनाचा प्रसार पाहता गर्दीतून प्रवास करणे आम्हाला सुरक्षित वाटत नव्हते. आम्ही वसतिगृहात राहिलो तर स्वत:सोबतच कु टुंबीयांनाही सुरक्षित ठेवू असे वाटले. खानावळीतील कर्मचारी वसतिगृहातच राहात असल्याने जेवणाची सोय होते. वसतिगृहातील शिपाई आवश्यक ते सामान आणून देतात. आमच्यापैकी काहींनी ऑनलाइन अभ्यासक्रम शिकण्यास सुरुवात के ली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या ध्वनिफितींच्या आधारे आम्ही मेडिटेशन करतो. काहीजण आपले छंद जोपासत आहेत,’

वरळीच्या वसतिगृहात गैरसोय

वरळीच्या बीडीडी चाळीत ११६ क्रमांकाच्या इमारतीमध्ये संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. ११७ क्रमांकाच्या इमारतीमध्ये ३ करोनाबाधित आढळल्याने सध्या वसतिगृहातील मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘माझी बहीण तिच्या प्रकल्पाच्या कामासाठी मैत्रिणीकडे गेली होती. ती आल्यानंतर निघणार होतो. पण आम्ही ज्या दिवशी पोहोचणार त्या दिवशी संचारबंदी असल्याने घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होणार नव्हते. संचारबंदीनंतर जाऊ असे वाटले, पण लगेच टाळेबंदी सुरू झाली. सध्या आम्ही अभ्यासात मन रमवतोय. आई-वडील काळजीने सतत फोन करत असतात. बाजारात भाजीपाल्याची कमतरता असल्याने खानावळीतील जेवणाचा दर्जाही घसरलाय. जवळच्या दुकानात सॅनिटरी पॅडची कमतरता असल्याने गैरसोय होते आहे. आमच्या वॉर्डन वसतिगृहात फिरकतही नाहीत. काही अडचण असेल तर आम्ही मुलांच्या वसतिगृहातील वॉर्डनना सांगतो. घरी जाण्याची काहीतरी सोय व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांना पत्र लिहिले आहे,’ असे बीडची विद्या बनसोडे सांगते.