महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यामध्ये मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. मात्र प्रत्यक्षात बाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात आल्याचे समाधानकारक चित्र मुंबईत आहे. देशभरातील रुग्णांची संख्या एका आठवडय़ात ज्या झपाटय़ाने वाढली. मात्र त्या तुलनेने महाराष्ट्रातील आणि मुंबईतील रुग्णाचा आलेख हा बराचसा सरळ रेषेत ठेवण्यात मुंबईला यश आले आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २०३ असून त्यात मुंबईतील रुग्ण अधिक आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत जास्त दिसत आहे. मात्र मुंबई विमानतळावर १ मार्चपासून लाखोंच्या संख्येने प्रवासी दाखल झाले. तब्बल पावणे तीन लाख प्रवाशी विमानतळावरच तपासण्यात आले. या प्रवाशांमधून रुग्ण शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने जी पावले उचलली त्यामुळे रुग्णांना शोधून काढता आले. तब्बल ३००० पेक्षा अधिक लोकांच्या प्रत्यक्ष चाचण्या करण्यात आल्यामुळे संसर्ग वाढण्याआधीच रुग्ण शोधून काढणे सोपे झाले. देशात टाळेबंदी लागण्यापूर्वीच महाराष्ट्रात टाळेबंदी लागू झाली होती. त्यामुळे मुंबईवर या प्रवाशांचा सगळ्यात मोठा ताण होता. मात्र अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्याचे नियोजन करण्यात आले होते. घरीच विलगीकरण केलेल्या या रुग्णांशी नियमित संपर्क साधून त्यांचाही मागोवा घेण्यात आला. याच बरोबर एका बाजूला सामाजिक संसर्ग शोधून काढण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. विभाग स्तरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने घरोघरी भेटी देऊन लक्षणे असलेल्या रुग्णांना शोधण्याचेही काम केले. ४० हजार घरातील पावणे दोन लाख लोकांची अशी तपासणी करण्यात आली. राज्यात ३५ रुग्ण पूर्ण बरे राज्यात करोनाग्रस्त असलेल्या २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. दरम्यान, बाधितांपैकी पूर्णपणे बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ पुण्याचे आहेत. जगभरातील मृत्यू ३१ हजारांवर जगभरात विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या रविवारी ३१ हजार ४१२ झाली. त्यापैकी दोनतृतीयांशहून अधिक मृत्यू युरोपमध्ये झाले आहेत. अमेरिकेत करोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक, म्हणजे १ लाख २४ हजार ६८६ इतकी आहे. तेथे २१९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील बळी २७ करोनाच्या संसर्गामुळे रविवारी ६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण बळींची संख्या २७ वर पोहोचली, तर करोनाबाधितांचा एकूण आकडा १,०२४वर गेला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अजूनही प्रवास सुरूच.. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या परराज्यांतील नागरिकांनी त्यांच्या मूळ गावांच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेपर्यंत रविवारी दुपापर्यंत नव्याने काही लोक दाखल झाले होते.