"मुंबई शहरातल्या काही शक्ती भारत आणि पाकिस्तानची मैत्री होऊ नयेत या मताच्या आहेत. पण या शक्तींचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत" अशा शब्दात ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेनेचा नाव न घेता समाचार घेतला आहे. दीर्घकाळ भाजपशी संबंधित असलेले कुलकर्णी 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन' (ओआरएफ) या थिंक टँकचे प्रमुख आहेत. 'ओआरएफ'ने काश्मीर प्रश्नावर आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. भारत- पाकिस्तानमधल्या कुठल्याही संबंधांना शिवसेनेचा असलेला विरोध सर्वश्रुत आहे. सेनेचा हा विरोध फक्त राजकीय न राहता कला तसंच क्रीडा क्षेत्रातही दिसला आहे. मग ती दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानातली खेळपट्टी खणणं असो की पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये येण्यास विरोध असो शिवसेनेने आपला विरोध नेहमीच कडवा ठेवला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना हा मोठा टोला सुधींद्र कुलकर्णी यांनी दिला आहे. 'काश्मीर- अ डायलाॅग फॉर पीस अँड इंटिग्रेशन' ही एकदिवसीय परिषद मुंबईच्या नरीमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. "काश्मीरची वेदना ही मुंबईची वेदना आहे. काश्मीरचं दु:ख हे मुंबईचे दु:ख आहे" अशा शब्दात या परिषदेत उद्घाटनाचं भाषण करणाऱ्या सुधींद्र कुलकर्णी यांनी काश्मीर प्रश्न हा भारत- पाकिस्तान संबंधातला महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या इस्रायल दौऱ्यादरम्यान त्यांनी मुंबईमधल्या दहशतवादी हल्ल्यात अनाथ झालेल्या लहानग्या मोशेची भेट घेतली होती. 'काश्मीरमध्ये असे अनेक मोशे आहेत' अशा शब्दात सु्धींद्र कुलकर्णी यांनी काश्मीरची व्यथा उपस्थितांपुढे मांडली. 'ओआरएफ'च्या या परिषदेला चांगला प्रतिसाद लाभला. काश्मीरमधून आलेले अनेक पत्रकार, तिथल्या विद्यापीठातले प्रोफेसर्स तसंच सत्तारूढ पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि विरोधातल्या नॅशनल कॉन्फरन्सचे प्रतिनिधी असे अनेक जण या परिषदेत उपस्थित होते. भारताचे पाकिस्तानमधले माजी राजदूत टीसीए राघवन् हेही या परिषदेला उपस्थित होते.