अर्थसंकल्प सादर झाल्यावर आमदारांच्या स्वीय सचिवांना बॅगा घेण्याची जास्त घाई झाली असावी व यामुळेच कागदपत्रे घेण्याचे त्यांच्याकडून राहून गेले असावे, असा षटकार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत मारल्याने सारेच सदस्य अवाक झाले. अर्थसंकल्प सादर झाल्यावर वित्तमंत्र्यांच्या भाषणाची प्रत दोन तासांनी मिळाली, तसेच अर्थसंकल्पाची काही पुस्तके आज (मंगळवारी) देण्यात आल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. हा नियमांचा भंग असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे होते. यावर सारी कागदपत्रे बॅगांमध्ये भरणे शक्य झाले नाही. यामुळेच बॅगांबरोबरच काही पुस्तके स्वतंत्रपणे वाटण्यात आली. आमदारांच्या स्वीय सचिवांचे बहुधा याकडे लक्ष गेले नसावे किंवा बॅगा घेण्याच्या घाईत ते विसरले असावेत, असे मुनगंटीवार यांनी सांगताच विरोधी सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला.