जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन करून २२ क्विंटल साखरेची साठेबाजी केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही कायम केल्याने जळगाव येथील दुकानदाराला १९ वर्षांनंतर तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच दंडाची एक हजार रुपये जर भरले गेले नाहीत तर आणखी २० दिवस या दुकानदाराला तुरुंगात घालवावे लागणार आहे. अशोक आहुजा (५६) याला जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत दोषी धरून तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा न्यायमूर्ती ए. आय. एस. चीमा यांनीही कायम केली. ७ जून १९९५ रोजी आहुजा यांच्या गोदामावर छापा टाकत २२ क्विंटल साखरेचा साठा जप्त केला होता. ‘महाराष्ट्र साखर विक्रेता परवाना कायद्या’नुसार परवान्याशिवाय दुकानदाराला केवळ १० क्विंटल जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे.