सुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज (मंगळवार) सेवानिवृत्त होत आहेत. ते ३१ जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते. मात्र राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना एक महिन्याची मुदतवाढ मिळाली होती. मलिक हे १९८२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभागाचे (राज शिष्टचार) अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ज्येष्ठतेच्या निकषावर त्यांना ही नवी संधी मिळाल्याचे म्हटले जाते. मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ सुमारे दोन वर्षांचा असेल.