मेट्रोचे कारशेड आरेमधून कांजूरला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे हा प्रकल्प तर लांबणारच शिवाय सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कारशेड कांजूरमार्ग येथे स्थानांतरित करुन मेट्रो ३ चे प्रश्न सुटणार नाहीतच शिवाय मेट्रो ३ आणि ६ अशा दोन्ही मेट्रोंच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. मेट्रो-६ च्या आरे ते कांजुरमार्ग या भागात विविध मार्गावरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळे मेट्रो-६ च्या कार्यान्वयनात तर प्रचंड गुंतागुंत निर्माण होईलच तसेच याचा मेट्रो-३ वरही परिणाम होईल. आणि या दोन्ही मेट्रोंच्या कार्यान्वयीन क्षमतेवर परिणाम होईल, शिवाय नुकसानही वाढेल.

आणखी वाचा- मुख्यमंत्र्यांना याची उत्तरं द्यावी लागतील; शेलारांनी मेट्रो कारशेडवरून उपस्थित केले प्रश्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी म्हणतात त्याप्रमाणे हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव! टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली, पण कार डेपो ४-५ वर्ष असणार नाही. या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेची ही अखेर. वाढीव किंमतीचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच वसुल होणार! असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- आरे कारशेड : आर्थिक तोट्यावरुन अमित ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांना सुनावले, म्हणाले…

पर्यावरणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा मी सन्मानच करतो पण आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती. पण आता हेच पर्यावरणवादी मिठागराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेड उभारली जाण्याचे समर्थन करणार का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.