अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला असून, कोकण किनारपट्टीसह अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. तर, मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन, मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्रावर ‘तौते’ चक्रीवादळाचं संकट; पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “वादळ गुजरातच्या दिशेने चाललं आहे, आपण सगळ्यांनीच सावध रहावं. कारण, कोकण किनारपट्टी, मुंबई, पालघर, रायगड सगळीकडेच आपण पूर्व तयारी करत होतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आम्ही सर्वच बैठका घेत होतो, आता देखील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं सुरू आहे. मनपा हद्दीत देखील पाणी कुठं-कुठं साचलं आहे, याची माहिती घेतली जात आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या वाऱ्याचा वेग संध्याकाळपर्यंत किती वाढलेला असेल, याबाबत देखील माहिती घेतली जात आहे. पाणी जिथं साचलं आहे, तिथं तत्काळ काही उपाययोजना करता येतील का? हे देखील पाहिलं जात आहे. तीन जम्बो कोविड केअर सेंटर आपण रिकामे केले असून, तेथील रूग्ण अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. रात्रीपर्यंत तरी आपण काळजी घेणं आवश्यक आहे.”

“मुंबईकरांचं जे नुकसान झालं त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही!”

तसेच, “मी पुन्हा एकादा नागरिकांना सांगतो की, कोविड आहे तर घरातच रहा. जे अति महत्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडले आहेत, त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सध्याचे जे वारे आपण पाहतो आहोत, मुंबईत कधीच न झालेले असे हे वारे आहेत. कुठंही जीवीतहानी होणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत.” अशी देखील माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

Tauktae cyclone: चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या तीन विमानांनी मार्ग बदलला—

चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळ चार वाजेपर्यंत बंद करण्यात आलं असल्याने विमान सेवेवरही परिणाम झाला आहे. विमानतळ बंद असल्याने मुंबईत लँडिंग करणाऱ्या तीन विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे.