तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांना नऊ महिने पगारच नाही
नऊ महिने पगार नाही, मग रिक्षा चालवणार नाही तर करणार काय?.. तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका अध्यापकाची ही कहाणी!.. पण सर्वच अध्यापकांच्या म्हणण्यानुसार त्यांना नऊ महिन्यांत पगार मिळालेलाच नाही.. जमेल तसे घर चालवावे लागत आहे. कोणी नातेवाईक अथवा मित्रांकडून उसनवार घेऊन संसाराचा गाडा ओढत आहेत.
सरकारने मागासवर्गीयांच्या फी प्रतिपूर्तीचे तब्बल २२ कोटी रुपये थकविल्यामुळे शिक्षकांना वेतन देण्यात अडचण निर्माण झाली असली तरी सर्व अध्यापकांना त्यांचे वेतन दिले जाईल, ही हमी संस्थाचालकांनी दिली आहे, तर राज्यातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांना अध्यापक -कर्मचाऱ्यांना महिने महिने वेतन मिळत नसल्याची गंभीर दखळ घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांनी तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचीत समस्येची चौकशी करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालकांना जारी केले आहेत.तासगावकर संस्थेची कर्जत येथील भिवपुरी येथे एकूण आठ महाविद्यालये असून यात अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण तसेच एमबीए आदी अभ्यासक्रम चालविण्यात येतात. संस्थेतील सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून एकूण आठ हजार प्रवेश क्षमता असली तरी गेल्या वर्षी वेतनावरूनच झालेल्या आंदोलनानंतर प्रवेश क्षमता घटून साडेचार हजार एवढी झाली आहे. या परिस्थितीतही तासगावकर संस्थेतील अध्यापक वगळता अन्य कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यात येते, पण अध्यापकांना मात्र नऊ महिने वेतन मिळालेच नसल्याचे येथील अध्यापकांचे म्हणणे आहे. तथापि आपले नाव जाहीर झाल्यास नोकरी गमवावी लागेल या भितीपोटी कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. यातील काही अध्यापक खाजगी शिकवण्या करून चरितार्थ चालवत असून अन्य महाविद्यालयांमध्येही जवळपास अशीच परिस्थिती असल्यामुळे नोकरी सोडण्याची अथवा जाहीरपणे आवाज उठविण्याची हिम्मत आम्ही करू शकत नाही, असे काही अध्यापकांचे म्हणणे आहे. रिक्षा चालविणारे अध्यापक आपले नाव जाहीर करण्यास तयार नाहीत. दिवसा महाविद्यालयात शिकवतो, पण भविष्यात काय वाढून ठेवले आहे त्याची कल्पना नसल्यामुळे रात्री रिक्षा चालवतो, असे त्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. संस्थेने दोन वेळा बँक ऑफ महाराष्ट्रमधून आमच्याच नावे ओव्हरड्राफ्ट काढून वेतन दिले. तथापि थकबाकी वाढल्याने बँकेकडून त्यावर दंड आकारण्यात येत असल्याचेही या अध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी संपाचे पाऊल उचलले नसून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीच आता लक्ष घालावे, असे साकडेही या अध्यापकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना घातले.

अध्यापकांच्या नऊ महिन्याची वेतनाची थकबाकी नसून केवळ सहा महिन्यांची आहे व तीही गेल्या वर्षीची आहे. गेल्या मार्चपासून डिसेंबर २०१५ पर्यंत सर्व अध्यापकांना महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन देण्यात येते. शासनाच्या नियमाप्रमाणे अध्र्या जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार जागा राखीव ठेवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या फी पोटीची रक्कम शासनाकडून वेळेवर देण्यात येत नाही.शासनाकडून सुमारे २२ कोटी रुपये येणे असल्यामुळेच संस्थेपुढे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांचे वेतन दिले जाईल. नऊ महिन्यापासून वेतन दिले जात नसल्याचे अध्यापकांचे म्हणणे असेल तर ते खोटे बोलतात.
डॉ. नंदकुमार तासगावकर, अध्यक्ष तासगावकर संस्था़