‘भावी काळ कसा असेल, जग नेमके कोणत्या दिशेने जाणार आहे आदी प्रश्नांविषयी जगभरात लोकांना खूपच उत्सुकता आहे. आता जगाचा गुरुत्त्वमध्य बदलत असून कोणतीही भूराजकीय गोष्ट जगाचे भवितव्य ठरवणार नाही तर आपल्या साऱ्यांचे भविष्य आणि भवितव्य हे डेटाबेसमध्ये दडलेले असेल. एकाच वेळेस ते अमूल्यही असेल आणि विघातकही. कारण त्यातूनच आपले व्यवहार आकारास येणार आहेत, आपले वर्तनही त्याच गोष्टींभोवती फिरत असेल त्यामुळेच त्याला अनन्यसाधारण महत्त्व आलेले असेल. पण याच डेटाबेसमध्ये घुसखोरी झाली तर ती सर्वासाठी तेवढीच धोकादायकही असेल’
.. द्रष्टा (फ्यूचरॉलॉजिस्ट) म्हणून प्रसिद्ध असलेले माइक वॉल्श यांचे भविष्यातील तंत्रज्ञान क्रांतीविषयीचे हे परखड मत आणि तेवढाच गंभीर इशारा!.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या नासकॉमच्या ‘इंडिया लीडरशिप फोरम २०१३’ या वार्षिक अधिवेशनास आजपासून मुंबईमध्ये सुरुवात झाली. या अधिवेशनात भविष्याचा वेध घेणाऱ्या सत्रासाठी वॉल्श यांना पाचारण करण्यात आले होते. या पुढच्या काळातील आपल्या सर्वाचेच भविष्य हे डेटाबेसमध्ये दडलेले असेल, असे विधान त्यांनी आपल्या सादरीकरणामध्ये केले. त्यानंतर ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना वॉल्श म्हणाले की, येणाऱ्या काळात पारंपरिक पद्धतीने राज्य करणाऱ्या राजकारण्यांना जगभरातील नव्या टेक्नोसॅव्ही पिढीकडून मिळणाऱ्या जबरदस्त आव्हांनाना सामोरे जावे लागणार आहे. याची एक झलक आपल्याला इराण, टय़ुनिशियामध्ये तर पाहायला मिळालीच. पण भारतातही बलात्कारानंतर उसळलेल्या जनसामान्यांच्या संतापाच्या उद्रेकामध्ये पाहायला मिळाली. खरे तर जगभरातील राज्यकर्त्यांसाठी हा मोठा इशारा आहे. तो त्यांनी ध्यानात घेतला नाही तर राज्यकर्ते या टेक्नोसॅव्ही पिढीच्या त्सुनामीखाली सपाट झालेले पाहायला मिळतील.
या नव्या पिढीच्या सवयी आणि त्यांचे वर्तन हे केवळ बाजारपेठेलाच नव्हे तर राज्यकर्त्यांनाही समजून घ्यावे लागणार आहे. काहीसे ऐकायला विचित्र वाटेल पण तुम्ही ‘व्हिडिओ गेमिंग’ हा प्रकार तार्किकपद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला या वर्तनाची कल्पना येऊ शकते. त्याचप्रमाणे या पिढीसाठीचे इनोव्हेशन असलेले उत्पादन निर्माण करायचे असेल तर त्यासाठी २००७ नंतर जन्माला आलेल्या पिढीच्या लहान मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करा, तर तुम्हाला २०२५मध्ये काय दडलेले असेल, त्याचा अंदाज येऊ शकेल, असेही वॉल्श यांनी सांगितले.