राखी पौर्णिमेचा सण रविवारीच पार पाडला. बहिण भावाच्या नात्याचे बंध उलगडणारा हा दिवस. मात्र वसईत लहान भावानेच मोठ्या बहिणीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोठी बहिण मोबाईलवर जास्त वेळ बोलते. तसेच ती वालिव भागात राहणाऱ्या मुलांशी जास्त बोलते हा राग मनात धरून १७ वर्षांच्या भावाने त्याच्या १९ वर्षांच्या बहिणीची हत्या केली.

वसईतल्या वालिव भागात हा धक्कादायक प्रकार घडला. बहिण तिच्या मित्रासोबत जास्त वेळ फोनवर बोलते त्यामुळे समाजात बदनामी होते. या कारणामुळे लहान भावाने मोठ्या बहिणीला ठार केले. दुमडा येथील चाळीत राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी हा प्रकार घडला. वालीव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.