उत्तराखंडमधील जलप्रलयात गेल्या दहा दिवसांपासून अडकलेले ठाणे जिल्ह्य़ातील १०४ यात्रेकरू बुधवारी पहाटे पंजाब मेलने कल्याण रेल्वे स्थानकात दाखल झाले. देवभूमीतून आपले परतणे म्हणजे एक पुनर्जन्म आहे, अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.
ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी १३, कल्याण डोंबिवली ३५, ठाणे १६, कोल्हापूर जिल्ह्य़ातील ४० यात्रेकरू उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रपातात अडकले होते. डोंबिवलीचे बाळाराम पाटील गेली १४ वर्षे चारधाम यात्रेला जातात. पाटील यांनी सांगितले, १५ जूनला आम्ही यमनोत्री येथून दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी जात असतानाच पावसाने सुरुवात केली होती. एका वळणावरून आमची बस जात असतानाच समोर दरड कोसळली. दैव बलवत्तर अन्यथा आम्ही त्या दरडीत कोसळलो असतो.
या कालावधीत जिवंतपणीचे मरण आम्ही त्या ठिकाणी अनुभवले. खाण्यासाठी पिण्यासाठी झालेले हाल. स्थानिक शासनाचे असलेले दुर्लक्ष, त्या खडतर परिस्थितीमधून बाहेर पडताना आलेले अनुभव यात्रेकरूंनी सांगितले. आपण पुढच्या वर्षीही जाणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले. बालाजी ग्रुपचे मुकुंद पाटीलही या प्रवासात होते.