पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि बांधकामाची माहिती घेता यावी तसेच पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी राज्यातील सुमारे २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची राहण्याची व्यवस्था करण्याचा विचार सुरु आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून राज्य शासनाचा पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात ‘पर्यटन पर्व’ साजरे करण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, कंपन्यांच्या उपस्थितीत काल मुंबईत या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

‘पर्यटन पर्वा’च्या काळात एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना प्रोत्साहन सवलत देण्यात यावी, अशी सूचना यावेळी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. ते पुढे म्हणाले, राज्य शासनाने पारंपरिक पर्यटनाबरोबरच हेरीटेज, ॲग्री, क्रुझ, माईन, कॅराव्हान, वेलनेस, बॉलीवूड आणि वाईल्डलाईफ पर्यटन अशा विविध नवनवीन पर्यटन क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात या सर्वच पर्यटन क्षेत्रात मोठा वाव आहे. ‘पर्यटन पर्व’ च्या काळात पर्यटनाच्या या नवीन क्षेत्रांना उजाळा दिला जाईल, असे रावल यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत नुकतेच हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील ऐतिहासिक इमारती, किल्ले, राजवाडे यांची माहिती जाणून घेण्यात देश-विदेशातील पर्यटकांना मोठा रस आहे. त्यासाठी वारसा स्थळ पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने एमटीडीसीमार्फत यापुढील काळात व्यापक प्रयत्न करण्यात येणार आहेत.

एमटीडीसीमार्फत पर्यटन पर्वाच्या काळात राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आला आहे. निबंध स्पर्धा, ‘माय बेस्ट ट्रॅव्हल स्टोरी’ ही चित्रपट स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, प्रवासातील अनुभव शेअर करण्याबाबतची कार्यशाळा, चित्रकला-हस्तकला प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे.