अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग आज (मंगळवार) सकाळी रेल्वे रुळांवर कोसळला. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. सकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हा दुर्घटनाग्रस्त पुल दुरूस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. वाहनचालकांनी बाळासाहेब ठाकरे पुल जोगेश्वरी/ मिलन उड्डाणपुल सांताक्रूझ/ मृणालताई गोरे उड्डाणपुल मालाड गोरेगाव/ कॅप्टन गोरे पुल पार्ला/ अंधेरी सबवे/ खार सबवे/ मिलन सबवे या मार्गाचा वापर करण्याची सूचना प्रशासनाने केली. या मार्गाचा वापर केल्यास वाहनचालकांची गैरसोय होणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु आहे.