इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेला बंद सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला, यावरूनच सरकारने विरोधकांच्या एकजुटीला घाबरले हे स्पष्ट झाले असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. भाजपाचे नेते रविशंकर यांनी ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेतली त्यावरूनच मोदी सरकार सगळ्या स्तरावर अपयशी ठरले आहे हे दिसते आहे. इंधनाचे दर वाढणे हे आमच्या हातात नाही असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. ही बाब गंभीर आहे कारण दर कमी करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही. ज्या प्रकारे अतिआत्मविश्वासाने लोकांचा आमच्यावर विश्वास असल्याचे दावे केले जात आहेत त्याचे उत्तर मतपेटीतून नक्की मिळेल असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

इंधनावरचे अधिभार मागे घ्यावेत आणि जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेलचे दर आणावेत अशी आमची मागणी आहे. इंधनाचे दर आमच्या हाती नाहीत हे सरकारचे म्हणणे गंभीर आहेत. जर हे दर कमी झाले नाहीत तर सामान्यांच्या अडचणी वाढतील आणि याचे उत्तर जनता सरकारला मतपेटीतून देईल असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने पुकारलेल्या बंदला राज्यात आणि देशात चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात काही तुरळक अपवाद वगळता हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. एवढंच नाही तर आम्हाला इतर पक्षांनीही साथ दिली. मात्र सत्तेत राहून तोंडपाटिलकी करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे. शिवसेनेचा वाघ आता डरकाळ्या फोडत नाही तर भुंकू लागला आहे या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचीही आठवण यावेळी अशोक चव्हाण यांनी करून दिली. आमची लोकप्रियता जास्त आहे त्यामुळे या बंदचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही असे या सरकारला वाटत होते. मात्र हे सरकार आमच्या एकजुटीला घाबरले असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.