आयआयटी मुंबईतील मुलांना एक कल्पना सुचली की ती प्रत्यक्षात येईपर्यंत त्याचा पाठपुरावा सोडत नाहीत. अशाच दोन आयआयटीयन्सना अभिकल्पच्या संकल्पनेने वेड लावले आणि सुरुवातीला सामाजिक आशय देणाऱ्या रचनांमधून त्यांनी बडय़ा व्यावसायिकांसाठी अभिकल्प साकारण्यापर्यंत आपला व्यवसाय नेला. आवडीतून हा व्यवसाय साकारला गेला आणि आज त्यांचा चमू दोन जणांवरून ३० जणांपर्यंत पोहचला आहे. साहिल वैद्य आणि चिराग गंडर या दोघांनी उद्योगांचे ब्रॅण्डिंग करणारी सेवा सुरू केली. अभिकल्प अर्थात डिझाइनपासून ते कम्युनिकेशनपर्यंत सर्व सेवा पुरविण्यास सुरुवात केली असून ३ँी्रेल्ल्रें’्र२३ या नावाने त्यांचे फेसबुक पान आणि संकेतस्थळ सुरू केले आहे.

आयआयटीमध्ये एनर्जी या विषयात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेला साहिल आणि रसायनशास्त्रात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेला चिराग हे दोघेही एकत्र इंटर्नशिप करत होते. त्या वेळेस त्यांना एकदा लोक कुत्र्यांना नाहक त्रास देत असताना दिसले. यावरून एक पोस्टर तयार करायची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. डिझाइनमध्ये चांगली गती असलेल्या चिरागने त्याच्या संकल्पनेतून एक पोस्टर तयार केले आणि ते त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले. या पोस्टरला खूप चांगले लाइक्स मिळाले. लोकांनी त्याची वाहवा केली. यानंतर या दोघांनी विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे पोस्टर्स तयार करण्यास सुरुवात केली आणि ते पोस्ट करण्यासाठी theminimalist नावाचे फेसबुक पान सुरू केले. या पानावर अल्पावधीतच ५० हजारपेक्षा जास्त फॉलोव्हर्स मिळाले. यातच काही कंपन्यांनी या दोघांचे काम पाहून आमच्यासाठी काम करणार का, असा प्रस्ताव समोर ठेवला. सुरुवातीला असे काही करण्याचा मानस नव्हता, मात्र कंपन्यांनी समोरून ऑफर दिल्यामुळे या दोघांनी काम स्वीकारले आणि कंपनी आकारास आली.

दोन जणांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला पुढे वाढवत त्यांनी कंपन्यांचे ब्रॅण्डिंग आणि जाहिराती करून देण्याचे काम हाती घेतले. यासाठी एका वर्षांच्या कालावधीत कंपनीत ३० जणांचा चमू तयार झाला आहे. अवघ्या आठवडय़ाभरात कल्पक काम करून देण्याची क्षमता या कंपनीकडे यावी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी आवश्यक अशी माहिती पुस्तके, याचबरोबर कंपन्यांची मासिके बनविणे यासारख्या सेवाही या कंपनीमार्फत दिल्या जात असल्याचे साहिल सांगतो. याचबरोबर कंपन्यांच्या नावाचे अथवा उत्पादनांचे पोस्टर्स तयार करण्याचे कामही यांच्या कंपनीत केले जाते. याशिवाय कंपनीच्या कामाचा विस्तार करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगची सुविधाही पुरविण्यात येते. याचबरोबर संकेतस्थळ तयार करणे, कंपनीचे अ‍ॅप विकसित करणे, समाज माध्यमांवर कंपन्यांचे अस्तित्व ठेवणे आदी सेवाही पुरवीत असल्याचे साहिल सांगतो. जर कोणत्या कंपनीला त्यांचा जुना लोगो अधिक आकर्षक करावयाचा असेल किंवा त्याची रंगसंगती बदलायची असेल तर तेही काम करून देत असल्याचे साहिलने नमूद केले. कमीत कमी शब्दात किंवा कमीत कमी डिझाइनमध्ये जास्तीत जास्त भावार्थ सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. यामुळेच आम्ही फेसबुक पानाचे आणि कंपनीचे ३ँी्रेल्ल्रें’्र२३ हे नाव ठेवले आहे.

गुंतवणूक आणि उत्पन्न

हा व्यवसाय पूर्णत: कल्पकतेवर अवलंबून असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज पडली नाही. मात्र जसे काम मिळत गेले तसे आम्ही त्या कामाचे पैसे व्यवसायात गुंतवू लागलो. यामुळेच आज आमचा ३० जणांचा चमू होऊ शकला, असे साहिल सांगतो. कंपन्यांचे काम केल्यावर त्याचा मिळणारा मोबदला हेच कंपनीचे उत्पन्न आहे.

नवउद्यमींना सल्ला

आमचा व्यवसाय सुरू होऊन एकच वर्ष झाले आहे, मात्र या एक वर्षांत आम्ही रोज काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. असाच शिकण्याचा प्रयत्न नवउद्यमींनी केला पाहिजे. यामध्ये धोका पत्करायला घाबरायचे नाही, असा सल्ला साहिलने नवउद्यमींना दिला आहे. तुम्ही जर आयआयटीसारख्या संस्थांतून शिक्षण पूर्ण केले असेल आणि तुमचा नवउद्योग अपयशी झाला तरी काही काळजी करण्यासारखे कारण नाही. तुम्हाला नोकरी देण्यासाठी शेकडो कंपन्या तयार आहेत, पण अपयश आले म्हणजे तुम्ही खचून जाऊ नका हा अनुभव खूप काही शिकवणारा असतो, त्या शिक्षणाचाही आपल्याला नक्कीच फायदा होतो.

नीरज पंडित

@nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com